सुप्रीम कोर्टाच्या लोगोखाली (supreme court logo) असणाऱ्या ब्रीदवाक्यात बदल करून भारतात मनुस्मृती आणण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे दावे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतायेत.
काय आहेत दावे?
१. अशोक चक्र सिंह स्तंभाच्या खाली सम्राट अशोकाचे ब्रिद वाक्य सत्य मेव जयते बदलण्यात आले आहे..
.सत्यमेव जयते ऐवजी “यतो धर्मस्ततो जय” असे टाकन्यात आले आहे
याचा अर्थ जिथे धर्माच अस्तीत्व असतं.. तिथेच विजय असतो
असा होतो .
मनुस्मृति लागू झाली आहे… बहुजनांनो निवांत झोपा… बर्बाद होण्यासाठी अजून खूप काही बाकी आहे..
मोदी सरकारचा जाहीर निषेध
२. मोदी सरकार यांनी सुप्रीम कोर्ट मधील सम्राट अशोका यांचे ब्रिद वाक्य सत्यमेव जयते या मध्ये बद्दल करून ‘यतो धर्मस्ततो जय’ करण्यात आले आहे..आणि आम्ही सर्व मंडळी
भीम ,जय भीम करत राहत आहेत ,
आणि आपल्या लोकांना शिव्या देऊन एकमेका सोबत झगडा करत आहेत…
पण मोदी सरकार यांना जे काम कराचे आहे ते करत आहे..
आणि आपण सर्व लोक घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत आहेत..
याच वाक्यांत आपापल्या पद्धतीने बदल करून लोगोच्या इमेजसह हे दावे सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिकेत दुर्गे, पूजा खंडारे, अविनाश सोनावणे, प्रमोद अहिरे आणि अनिल कचरे यांनी आमचा अधिकृत व्हॉट्सऍप नंबर ‘9172011480’वर सत्यतेबद्दल विचारणा केलीय.
पडताळणी:
खूप मोठ्या प्रमाणात हे दावे वायरल होत असल्याने ‘सत्य माहिती शोधण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली. त्यासाठी सर्वात आधी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर शोधाशोध केली.
सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास:
आम्ही सर्वप्रथम सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहिले असता खरोखर लोगोवर ‘यतो धर्मस्ततो जयः’ असेच ब्रीदवाक्य असल्याचे आढळून आले. त्याच वेबसाईटवर History पेजवर क्लिक केल्यास आपणास भारतातील न्यायपालिकेचाच इतिहास थोडक्यात वाचता येईल.
ब्रिटीश काळात सुरु झालेल्या नव्या पध्दतीच्या न्यायपालिकेत पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही बदल करण्यात आले आणि १८६१ साली निर्माण झालेल्या कलकत्ता, मद्रास, बॉम्बे या उच्च न्यायालयांच्या वर अपील करता येण्यासाठी बनलेल्या फेडरल कोर्टचे स्वरूप बदलून २६ जानेवारी १९५० रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
२८ जानेवारी १९५० पासून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देशात न्यायपालिका काम पाहू लागली.
याच पेजवर असणाऱ्या माहितीमध्ये लोगो (supreme court logo) बद्दलही माहिती देण्यात आली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाचे धर्म चक्र प्रतिक’ या शीर्षकाखाली माहिती देण्यात आलीय.
सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोकचक्राला प्रेरित होऊन ३२ आरे असणारे चक्र आणि सिंह या लोगोत आहेत. खाली त्यांनी ब्रीदवाक्य आणि त्याचा अर्थही दिलाय.
२०१३ साली माहितीचा अधिकार:
इंडियन एक्स्प्रेसची २८ मार्च २०१३ रोजीची एक बातमी आहे. यात राहुल मोहोद यांनी माहितीच्या अधिकारात सुप्रीम कोर्टाच्या लोगोमध्ये (supreme court logo) ”यतो धर्मस्ततो जयः’ का आहे? या मागचा इतिहास आणि भूमिका विचारली होती.
म्हणजेच सदर घटना मोदी सरकार स्थापनेच्या, २०१४ च्या अगोदरची आहे हे तर स्पष्ट झाले.
‘यतो धर्मस्ततो जयः’ चा अर्थ:
अयोध्या राम मंदिर निकाल लागला तेव्हा अनेकांनी हे वाक्य वापरले होते त्याच अनुषंगाने ‘आज तक‘ने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी एक बातमी प्रकाशित केली होती. त्यात त्यांनी या वाक्याबद्दल काही माहिती दिलेली आहे.
‘यतः कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जयः’ या महाभारतातील वाक्याचा काही अंश म्हणजे हे ब्रीदवाक्य आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने युधीष्ठाराला प्रोत्साहित करताना हे वाक्य वापरले होते असे म्हणतात.
‘जिथे धर्म, कृष्ण आहे तिथे विजय आहे’ असा एकंदर त्याचा अर्थ .
परंतु यात धर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन हे अर्थ अभिप्रेत नसून ‘न्याय’ असा अर्थ अभिप्रेत आहे. यास पूरक म्हणजे सर्व्वोच न्यायालयाच्या वेबसाईट वरील हिस्ट्री पेज. त्याच्या सुरुवातीलाच असे लिहिले आहे की ‘धर्माची म्हणजेच न्यायाची संकल्पना प्राचीन भारतात वेदांपासूनक आली आहे. धर्मसूत्रात लिहिलेल्या नियमांवरून, न्यायशाखांमधून याची व्युत्पत्ती झाली आहे.’
‘सत्यमेव जयते’ अशोक स्तंभावर नाही:
व्हायरल पोस्टमध्ये अनेकांनी ‘सम्राट अशोकाचे ब्रिद वाक्य सत्य मेव जयते बदलण्यात आले‘ आणि हे ब्रीदवाक्य लिहिले असा उल्लेख केलाय. मुळात सारनाथ येथील अशोक स्तंभावर असे सत्यमेव जयते’ ब्रीदवाक्य नाही.
‘भारतकोश‘ वरील माहितीनुसार हे ब्रीदवाक्य सर्वात आधी राष्ट्रपटलावर आणण्यात आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्यात पंडित मदन मोहन मालवीय यांची प्रमुख भूमिका होती. हे वाक्य ‘मुण्डकोपनीषद’ मधील एका श्लोकात आहे.
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पंथा विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र सत्सत्यस्य परमं निधानम्॥
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की सर्वोच्च न्यायालयाच्या लोगोवरील ‘यतो धर्मस्ततो जयः’ हे ब्रीदवाक्य पूर्वीपासूनच आहे. याचा मोदी सरकारशी काहीएक संबंध नाही. ना त्यातील ‘धर्म’ हा शब्द कुठल्या धार्मिक बाबीशी किंवा समुदायाशी संबंधित आहे.
‘जिथे न्याय आहे तिथेच विजय आहे’ असा त्या ब्रीद्वाक्याचा अर्थ आहे. जनमानसात संभ्रम निर्माण करून, फसवे दावे करून वातावरण कलुषित करण्याचा हा कुणाचातरी खोडसाळपणा आहे.
[…] हेही वाचा: सुप्रीम कोर्टाच्या लोगोतील ‘सत्यमे… […]