दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील नेत्यांची आणि सरकारमधील पहिली बैठक काल कुठल्याही निष्कर्षाविना पार पडली. आता पुढची बैठक ३ डिसेंबर रोजी असल्याचं सांगण्यात येतंय. ह्या सर्व घडामोडीत सोशल मीडियात मात्र या आंदोलनाविषयी अनेक दावे केले जाताहेत. सोशल सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणातील गर्दीचा हा फोटो सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा (delhi chalo protest) असल्याचा दावा करण्यात येतोय.
‘मीडिया स्वराज’ नावाच्या पोर्टलने देखील दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधीच्या बातमीमध्ये हा फोटो वापरलाय.
पडताळणी:
आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने व्हायरल फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ‘मुंबई लाईव्ह’च्या ट्विटर हँडलवरून १० मार्च २०१८ रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला. ‘मुंबई लाईव्ह’नुसार सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ ठाणे येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सुमारे २५ हजार शेतकरी जमले होते. हे शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले होते.
आम्हाला ‘न्यूज एक्स्प्रेस २४’ या पोर्टलवरील बातमीत देखील हा फोटो मिळाला. बातमीनुसार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
लेखी आश्वासन, कालमर्यादा आणि सर्व मागण्या विधानसभेच्या पटलावर ठेवण्याचं मंजूर केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला होता. अखेर या तीनही गोष्टी मिळवल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं, असं या बातमीत म्हटलंय. सरकारने मान्य केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयीची सविस्तर माहिती देखील बातमीमध्ये देण्यात आली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील ११ मार्च २०१८ रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो पोस्ट केला होता. सीपीएमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनातून येत्या काळात भारतात उदभवणाऱ्या संघर्षाची कल्पना केली जाऊ शकते, असं विजयन यांनी ट्विट शेअर करताना म्हंटलं होतं.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो शेतकरी आंदोलना दरम्यानचाच असला तरी तो सध्याच्या दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा (delhi chalo protest) नाही.
व्हायरल फोटो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी सीपीएमच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यानचा आहे. या फोटोचा सध्याच्या दिल्ली येथील आंदोलनाशी काहीएक संबंध नाही.
हे ही वाचा- शाहिनबागच्या आंदोलनातील दादी पंजाबी शेतकरी बनल्याचा कंगना राणावतकडून फेक दावा
Be First to Comment