केंद्र सरकारच्या अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक या नवीन कृषी कायद्या विरोधात (farmers protest) पंजाब येथील शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ म्हणत राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली होती. मात्र या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरच रोखण्यात आलं. पंजाब-हरियाणा बॉर्डरवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
पोलिसांच्या या कृतीचा सोशल मीडियावर सर्व स्तरातून विरोध केला जातोय. सोशल मीडियात पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या पाण्याच्या माऱ्याचा पुरावा म्हणून काही फोटोज मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येताहेत. सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि इतरांनीही हे फोटोज शेअर केले आहेत.
युथ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे फोटोज शेअर केले गेले.
काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी, मनिष तिवारी, अनिल चौधरी, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा आणि युट्युबर ध्रुव राठी यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे फोटोज शेअर केले. फेसबुकवर देखील अनेकांकडून हे फोटोज शेअर केले जाताहेत.
पडताळणी :
सोशल मीडियावरील व्हायरल फोटोजचा आम्ही रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून शोध घेतला. आमच्या पडताळणीमध्ये असे आढळून आले की सध्याच्या शेतकरी आंदोलनाचे (farmers protest) म्हणून शेअर केल्या जात असलेले फोटोज साधारणतः २ वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनातील आहेत.
फोटो क्रमांक १
आम्हाला ‘द हिंदू’ची २ ऑक्टोबर २०१८ रोजीची बातमी मिळाली. या बातमीनुसार 23 सप्टेंबर 2018 रोजी हरिद्वार येथून किसान क्रांती यात्रेची सुरुवात झाली होती. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या किसान घाटाकडे कूच करत होते. मात्र त्यांना उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवरच अडविण्यात आलं. त्यावेळी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा गॅस आणि पाण्याचा मारा केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे.
फोटो क्रमांक २
दुसरा फोटो आम्हाला ‘नवोदय टाईम्स’च्या ३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या बातमीत वापरला असल्याचे आढळून आले. हरिद्वार येथून सुरु झालेली किसान क्रांती यात्रेचा शेवटी दिल्लीच्या किसान घाटावर पोहोचल्यानंतर समारोप झाल्याचे या बातमीत म्हंटले आहे. या यात्रेदरम्यान पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्या दरम्यान झालेल्या झटापटीच्या विविध फोटोंचा देखील या बातमीत समावेश आहे.
फोटो क्रमांक ३
तिसऱ्या क्रमांकाचा फोटो देखील पूर्वीप्रमाणेच किसान क्रांती यात्रेदरम्यानचाच असून ‘द क्विन्ट’च्या वेबसाईटवर ३ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला.
वस्तुस्थिती:
आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले गेले हे सत्य आहे याविषयीच्या बातम्या आणि व्हिडीओज आपण ‘येथे‘ पाहू शकता. परंतु ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की सोशल मीडियावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाचे म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असलेले फोटोज जवळपास २ वर्षांपूर्वीच्या ‘किसान क्रांती यात्रा’ आंदोलना दरम्यानचे आहेत. PTI चे छायाचित्रकार रवी चौधरी यांनी २०१८ मध्ये काढलेले हे फोटोज सध्या व्हायरल होताहेत.
हे ही वाचा- योगगुरू बीकेएस अयंगार यांचा व्हिडीओ नरेंद्र मोदींच्या नावाने व्हायरल!
Be First to Comment