पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोगातुई गावात 21 मार्च रोजी तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात 8 जणांचा बळी गेला आहे. बीरभूममधील हिंसाचाराच्या (Birbhum Violence) घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या मुद्द्यावरून भाजप-काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात आणीबाणी लागू करण्याची मागणी देखील केली जात आहे.
बीरभूम हिंसाचाराच्या संदर्भाने सोशल मीडियावर दावा केला जातोय की तृणमूलच्या मुस्लिम गुंडांकडून 10 हिंदू महिला आणि 2 बालकांची हत्या करण्यात आली. भाजपचे आमदार राजा सिंह (Raja Singh) यांनी बंगालमधील हिंदू लोकांच्या जीवाला धोका असून गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बंगालमधील हिंदूंना स्व-संरक्षणार्थ हत्यार बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट परिसरातील बोगुतुई गावात झालेल्या हिंसाचारामध्ये कुठल्याही हिंदू महिलेची किंवा बालकाची हत्या झाली नसल्याची बाब पश्चिम बंगाल पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. या दुःखद घटनेला धार्मिक स्वरूप देऊन राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे देखील पश्चिम बंगाल पोलिसांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
‘द टेलिग्राफ’च्या 24 मार्चच्या रिपोर्टनुसार हिंसाचारात 8 जणांचा बळी गेला. घटनेतील पीडित मीहिलाल शेख याने टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 32 वर्षीय शेली बीबी (मिहीलालची पत्नी), 7 वर्षीय तुली खातून (मिहीलालची मुलगी), 75 वर्षीय नूरनिहार बीबी (मिहिलालची आई), 44 वर्षीय रूपाली बीबी (मिहीलालची मोठी बहीण), 38 वर्षांची वर्षीय जहाँआरा बीबी (मिहीलालची वहिनी), 18 वर्षांची लिली खातून (मिहिलालची भाची), 22 वर्षांची काझी साजिदूर रहमान (लिलीचा नवरा) आणि 40 वर्षांची मीना बीबी (मिहिलालची वहिनी) यांचा समावेश आहे.
हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांच्या नावावरून स्पष्ट होते की सर्व पीडित मुस्लिम धर्मीय आहेत. सोशल मीडियातील 10 हिंदू महिला आणि 2 बालकांच्या हत्येचे दावे चुकीचे आहेत. बीरभूममधील दुर्दैवी हिंसाचाराला (Birbhum Violence) धार्मिक रंग देऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बीरभूम हत्याकांडातील सर्व संशयितांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तारापीठ येथून अनारुल हुसेन या स्थानिक तृणमूल नेत्याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या तरुणास उत्तर प्रदेश पोलिसांकडून मारहाण? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment