विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारात (bengal post poll violence) अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. अशातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक दावे, फेक न्यज पसरवल्या जाताहेत. या फेक दाव्यांच्या आधारे हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशाच काही दाव्यांच्या खऱ्या-खोट्याची ही पडताळणी.
दावा:
भाजपच्या प.बंगाल महिला मोर्चाच्या अध्यक्षा अग्निमित्र पॉल यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बीरभूम जिल्ह्यातील नानूर येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा दावा केला गेला .
वस्तुस्थिती:
बीबीसीच्या रिपोर्टनुसार ज्या महिलेवर बलात्कार झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय, तिनेच तृणमूलचे जिल्हा अध्यक्ष अणुब्रत मंडल यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं सांगितलंय. सोशल मीडियावर पसरविण्यात आलेले दावे खोटे असून हे दावे नेमके कुणी पसरवले याबाबतीत आपल्याला कल्पना नसल्याचं देखील या महिलेने सांगितलंय.
पोलिस अधीक्षक नागेंद्र नाथ त्रिपाठी म्हणतात, “सोशल मीडियावर पसरविण्यात आलेली बातमी खोटी आणि निराधार असून जिल्ह्यात बलात्काराच्या कुठल्याही घटनेची नोंद झालेली नाही. आम्ही नानूरच्या भाजप उमेदवाराबरोबरच स्थानिक नेत्यांशीही बोललो आहोत. त्यांना देखील अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेची कल्पना नाही.
दावा:
एक व्हिडीओ शेअर केला जातोय, ज्यामध्ये एक माणूस अत्यवस्थ दिसतोय. तो विव्हळत असल्याचं देखील बघायला मिळतंय. एक महिला त्या व्यक्तीला पाणी पाजायचा प्रयत्न करतेय. ती महिला देखील रडताना दिसतेय. हा व्हिडीओ बंगालमधील हिंसेचा असून आता बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावल्याशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला जातोय.
वस्तुस्थिती:
‘एनडीटीव्ही’च्या रिपोर्ट नुसार हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील खेडेगावातील घटनेचा आहे. अत्यवस्थ व्यक्ती कोरोना रुग्ण असून त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करणारी महिला त्याची मुलगी आहे.
व्हिडिओत दिसणारी दुसरी महिला ही त्या अत्यवस्थ रुग्णाची पत्नी आहे. वडलांना पाणी देणाऱ्या मुलीला तिच्या आईकडून थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण कदाचित आपल्या मुलीला देखील कोरोना होईल, अशी भीती तिला वाटतेय. सहाजिकच या व्हिडिओचा पश्चिम बंगालशी कसलाही संबंध नाही.
दावा:
हिंसक जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला जातोय. हा जमाव म्हणजे तृणमूल काँग्रेसचे गुंडे असल्याचा दावा केला जातोय. हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच तृणमूलच्या गुंडांनी हल्ला केल्याचं सांगितलं जातंय.
वस्तुस्थिती:
‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या १४ जानेवारी २०२१ रोजीच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ ओडिशामधील भद्रक जिल्ह्यातील एका गावातील आहे. भद्रक जिल्हयातील गावात पोलिसांच्या भीतीमुळे एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला होता. म्हणजेच या व्हिडीओचा देखील पश्चिम बंगालमधील हिंसेशी कसलाही संबंध नाही.
हे ही वाचा- तृणमूल कॉंग्रेसने बूथ कॅप्चर करून हिंदूंना इच्छेविरुद्ध मत द्यायला भाग पाडल्याचा दावा करणारे व्हिडीओ फेक!
[…] […]